प्रतिनिधी
दौंड - दौंड जंक्शन येथे रेल्वे सुरक्षा दलाने सलग 2 दिवस केलेल्या कारवाईत भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस मधून एकूण 57 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
बेवारस बॅगांच्या माध्यमातून गांजाची वाहतूक केली जात होती.
दौंड रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक विजय कुमार सोलंकी यांनी या बाबत माहिती दिली.
भुवनेश्वर - मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) दरम्यान धावणाऱ्या कोणार्क एक्सप्रेस मधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (10 जुलै) रोजी रात्री दौंड रेल्वे स्थानकावर एक्सप्रेसची तपासणी करण्यात आली.
यात एस - 5 या कोच मध्ये आसन क्रमांक 39 व 40 च्या खाली 2 बेवारस ट्रॅाली बॅग आढळल्या. या कोच मधील प्रवाशांकडे विचारणा केली असता सदर ट्रॅाली बॅग बेवारस असल्याची बाब पुढे आली. सदर बॅग उपस्टेशन पर्यवेक्षक यांच्या दालनात नेऊन उघडण्यात आली.
त्यामध्ये एकूण 33 किलो 800 ग्रॅम गांजा आढळला.तसेच मंगळवारी (11 जुलै) रोजी रात्री कोणार्क एक्सप्रेसच्या बी - 1 या कोच मधील स्वच्छतागृहाजवळ 3 बेवारस सॅक आढळून आल्या. त्यामध्ये एकूण 23 किलो 400 ग्रॅमगांजा आढळला.
निरीक्षक विजय कुमार सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक फेमिदा खान यांच्यासह दिलीप बारवे,नूर शेख,प्रदीप गोयकर, श्री. केंगले,काशिनाथ फुलारी यांनी ही कारवाई केली असून,सदर गांजा कोणार्क एक्सप्रेस मध्ये कोणी ठेवला व तो कोठे उतरविला जाणार होता. याविषयी पोलिस प्रशासन सध्या अनभिज्ञ आहे.
सदर गुन्हा व जप्त केलेला गांजा दौंड लोहमार्ग पोलिसांकडे तपासाकरिता वर्ग करण्यात आला आहे.
👁️ Post Views : 670