प्रतिनिधी
इंदापूर :- इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीचं काम सुरु असताना माती खाली पडून चार मजूर मातीच्या ढिगाऱ्यात अडकले होते. त्या 4 ही मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. एक मृतदेह 66 तासांनी सापडला होता, त्यानंतर 4 तासाने आणखी 3 मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. तब्बल 70 तासाने चारही जणांचे मृतदेह सापडले आहेत.
70 तासाने चारही मजुरांचे मृतदेह सापडले
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावात विहिरीचं रिंग मारण्याचं काम सुरू असताना अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. यामुळे चार मजुर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. ही दुर्घटना 1 ऑगस्ट रोजी घडली होती. पण, त्याचा उलगडा रात्री उशिरा झाला, त्यानंतर शोध आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. आता सुमारे तीन दिवसांच्या शोध कार्यानंतर 4 ही मजुरांचे मृतदेह सापडले आहेत.त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं आहे.
माती विहिरीत पडल्यानं 4 मजूर अडकले होते.
सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण आणि मनोज मारुती चव्हाण हे चार कामगार त्या ठिकाणी विहिरीचं रिंग मारण्याचं काम करीत होते. अचानक त्यांच्यावरती हा मलबा आणि विहिरीचा स्लॅब कोसळला आणि त्या ढिगार्याखाली हे चार मजूर अडकले होते. ही चारही लोक नेहमीप्रमाणे आपल्या घरी सायंकाळी परतले नाहीत तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि हा शोध शेवटी त्या विहिरीजवळ येऊन थांबला. त्या ठिकाणी त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या. मात्र चारही मजूरांचे मोबाईल नंबर लागू शकले नसल्यामुळे गावकऱ्यांनी विहिरीच्या ढिगार्याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली.
विहिरीचे काम बेकायदेशीर, नागरिकांचा आरोप
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळून चार जण मातीखाली गाढले असल्याने प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरु होती. दुर्घटनेत अडकलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले आहेत. यावेळी या घटनेतील चार जण हे बेलवाडी गावचे नागरिक आहेत.विहिरीचे काम बेकायदेशीर असून या मालकाने चार कुटुंबांचा जीव धोक्यात घातला, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बेलवाडीच्या महिला सरपंच मयुरी जामदार आणि नागरिकांनी केली आहे.
👁️ Post Views : 2,980